
Guru Shishya Sukhanandsamwad as on 3rd April 2026
देवाच्या त्या प्रेमासाठी। घडल्या देवप्रेमभेटी। भेटीतल्या साठवलेल्या प्रेमा दाखवितो । देवाचे या प्रेम घेऊनी देवासी अर्पितो ॥
मनोविजय ग्रंथाचे वाचन चालू होते. मनाची शते वाचता वाचता मनाचे दोष जायच्या आधी दृष्टीवरील मळभ दूर व्हायला सुरुवात झाली होती. मनाचे दोष दिसायला लागले होते. मनोविजय ग्रंथ वाचनाचा मोठ्यात मोठा लाभ झाला असेल तर दृष्टी सुधारायला लागली होती व दोषांची जाणीव व्हायला लागली होती . अर्थात केवळ जाणीव झाल्याने दोष जातात असे नव्हे पण मन आता साधना करण्यास योग्य असे होऊ घातले होते व काय साधायचे आहे याची थोडीफार कल्पना आली होती.
द्रोणाचार्यांनी अर्जुनाला लक्ष्यावर बाण सोडण्यास संमती दिली कारण अर्जुन आता साधनायोग्य झाला होता. संमती देण्यापूर्वी अर्जुनाच्या दृष्टीतील दोष दूर करण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता व दृष्टी साफ होईपर्यंत त्यांनी संयम बाळगला होता . अर्जुनाला फक्त लक्ष्य दिसायला लागले व इतर गोष्टी दिसेनाशा झाल्या ही दृष्टी बदलल्याची खूण होती . संकेत होता. मतिमंद ते साधनायोग्य होती. भूमी तयार झाली होती. बीज रोवण्याचा शुभसमय आला होता .आता लक्ष्य गाठायचे आहे. अर्जुना , चल उचल ते धनुष्यबाण आणि वेध घे त्या लक्ष्याचा, द्रोणाचार्यांनी आज्ञा केली.
मनोविजयाच्या माध्यमातून प्रभूच मार्गदर्शन करत होते.मना सज्जना भक्तिपंथेचि जावे ही सुरुवात होती. ग्रंथ संपत आला तसे प्रभू कुठे निर्देश करत आहेत हे लक्षात यायला लागले होते. भक्तिमार्गाने वाटचाल करत शोध कशाचा घ्यायचा ? वसे हृदयी देव तो कोण कैसा । पुसे आदरे साधकु प्रश्न ऐसा ॥ या प्रश्नापर्यंत प्रभूंनी मला आणले होते. प्रापंचिक दृष्टी लोप पावत होती व पारमार्थिक दृष्टीचा उदय होत होता. मनोविजय ग्रंथाची ही फार मोठी उपलब्धी होती . प्रभूंच्या प्रयत्नाला यश येत होते . अर्जुना तू जाण रे ।होसी बा सुजाण रे । विश्व नाही मीच आहे। सखया तुझी आण रे ॥ अर्जुना तू जाण रे ।
देवाला आधी प्रभूंच्या अंतःकरणात शोधायचे आहे . माझ्याच अंतःकरणात प्रभूंना पहायची दृष्टी यायला अजून अवकाश होता .
देवाचे या प्रेम घेऊनी .. श्रीपरमानंदार्पणमस्तु .