Episode 494 as on 31st March 2026
31 March 2026

Episode 494 as on 31st March 2026

Guru Shishya Sukhsamwad

About

Guru Shishya Sukhanandsamwad as on 31st March 2026

देवाचे या प्रेम घेऊनी देवासी अर्पितो। आनंदासी घेतो,  प्रेमे आनंदासी घेतो ॥

त्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी ठरल्याप्रमाणे संध्याकाळी सहा वाजता आम्ही श्रीभवानंदस्वामी यांच्या ठाणे येथील निवासस्थानी जमलो. आम्ही चौघे नव्याने सुसंस्कारित प्रेमीजन तसेच अन्य काही मंडळी उपस्थित होती . भाऊंनी सर्वांचे स्वागत केले व प्रभूंनी प्रास्ताविक केले. त्या छोटेखानी निवेदनातून प्रभूंनी पुढील कार्याची दिशा स्पष्ट केली. एव्हाना मला अंदाज यायला लागला होता. माझ्या मनात विचार येत होते कार्य आता केवळ चर्चेपुरतं मर्यादित रहाणार नाही . कार्याला निश्चित असे कारण असायला हवे . कार्य जीवनोन्मुख झाले तरच जीव जीवभावापासून अलिप्त होईल व मनाचा कल  ईश्वराभिमुख होण्याची शक्यता निर्माण होईल . मी असा विचार करत असताना अनपेक्षितपणे प्रभूंनी मला थोडक्यात बोलायला सांगितले . मी प्रभूंनी गुरुमंत्राचा संस्कार केला व नुसता संस्कारच नाही तर तीन टोकांच्या त्रांगड्यामधून सुटका केली म्हणून कृतज्ञता व्यक्त केली. आता मी आणि प्रभू अशी दोनच टोके उरल्यामुळे माझा मार्ग आता प्रशस्त,  सुगम व सुकर झाला होता . भाव एकदिशीय करणे आता सुलभ होणार होते .

 

दरम्यान आणखी एक विशेष घटना घडत होती. महाराज असल्यापासून दत्तपीठामध्ये दत्तप्रभूंच्या पादुका प्रतिष्ठापित होत्या. गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर परमानंदस्वामींनी त्या पादुकांची स्थापना त्यांचे परमभक्त व परमस्नेही श्रीभवानंदस्वामी यांच्या निवासस्थानी प्रस्थापित केल्या.हा एक विलक्षण दुग्धशर्करा अमृतयोग होता. भाऊंच्या दृष्टीने तर परमभाग्य उदयास आले होते   . कृपये परमानंद फळे. भाऊ कृतकृत्य झाले होते व आपल्या भावपूर्ण मनोगतातून त्यांनी प्रभूंविषयी कृतज्ञता व्यक्त केली . भाऊंचे निवासस्थान आता पादुकामंदिर झाले होते. या मंदिरातच आता प्रभूंचे गुणगायन अनवरत होणार होते . भविष्य काळात मलाही त्याचा लाभ होणार होता .

 

कार्यक्रमाचा समारोप प्रभूंच्या निरूपणाने झाला . " आतापर्यंत कार्य घडत राहिले पण त्याचा नेमका कुणाला काय लाभ झाला याचा कधी विचार आपण केला आहे का ? जे काही घडत गेले त्याला कार्य तरी कसे म्हणावे ? कार्य तेच जे बुध्दीला प्रगल्भ करते . शुध्द व निश्चयात्मक बुध्दी मनाला आनंदाचा शोध  घ्यायला प्रवृत्त करते . पण मनाच्या ठिकाणी संसारभाव असतो म्हणून आम्हाला प्रथम जीवाच्या जीवनात व नंतर मनात प्रवेश करायला लागतो. सद्यस्थितीत शब्दबंबाळ बुध्दी या प्रकियेच्या आड येत आहे आणि मनाला व्यापक आनंदाच्या अनुभवापासून दूर नेत आहे . जीवन कार्यापासून व कार्य जीवनापासून अलिप्त राहू शकत नाही . म्हणून आता कार्याची फेरमांडणी करणे आवश्यक आहे . आजचा दिवस महत्वाचा आहे . आज कार्य कात टाकत आहे . आजच्या गुरुमंत्र संस्काराने या नवीन कार्याचा श्रीगणेशा झाला आहे .येणाऱ्या काळात इथे फक्त भक्तीचा बोलबाला असणार आहे पुस्तकी ज्ञानाचा नाही. हा नियतीचा शुभसंकेत आहे. आमचे सर्वांना आशिर्वाद आहेतच "

 

प्रभूंच्या चेहर्‍यावर तेजस्विता होती. 'हा राम माझा ' च्या लिखाणातून त्यांनी बदलत्या कार्यस्वरूपाची चुणूक दाखवली होतीच . आता अधिक जोमाने प्रभू कार्यरत होणार होते . प्रभूंच्या जीवनचरित्रात  हा एक निर्णायक टप्पा होता .

 

या एका दिवसात माझ्याही  भक्तिजीवनात आमुलाग्र बदलाची चाहूल लागली होती .  आता एकीएक भावाचा प्रवास सुरू झाला होता. देवाचे या प्रेम घेऊनी

.... श्रीपरमानंदार्पणमस्तु