
Guru Shishya Sukhanandsamwad as on 31st March 2026
देवाचे या प्रेम घेऊनी देवासी अर्पितो। आनंदासी घेतो, प्रेमे आनंदासी घेतो ॥
त्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी ठरल्याप्रमाणे संध्याकाळी सहा वाजता आम्ही श्रीभवानंदस्वामी यांच्या ठाणे येथील निवासस्थानी जमलो. आम्ही चौघे नव्याने सुसंस्कारित प्रेमीजन तसेच अन्य काही मंडळी उपस्थित होती . भाऊंनी सर्वांचे स्वागत केले व प्रभूंनी प्रास्ताविक केले. त्या छोटेखानी निवेदनातून प्रभूंनी पुढील कार्याची दिशा स्पष्ट केली. एव्हाना मला अंदाज यायला लागला होता. माझ्या मनात विचार येत होते कार्य आता केवळ चर्चेपुरतं मर्यादित रहाणार नाही . कार्याला निश्चित असे कारण असायला हवे . कार्य जीवनोन्मुख झाले तरच जीव जीवभावापासून अलिप्त होईल व मनाचा कल ईश्वराभिमुख होण्याची शक्यता निर्माण होईल . मी असा विचार करत असताना अनपेक्षितपणे प्रभूंनी मला थोडक्यात बोलायला सांगितले . मी प्रभूंनी गुरुमंत्राचा संस्कार केला व नुसता संस्कारच नाही तर तीन टोकांच्या त्रांगड्यामधून सुटका केली म्हणून कृतज्ञता व्यक्त केली. आता मी आणि प्रभू अशी दोनच टोके उरल्यामुळे माझा मार्ग आता प्रशस्त, सुगम व सुकर झाला होता . भाव एकदिशीय करणे आता सुलभ होणार होते .
दरम्यान आणखी एक विशेष घटना घडत होती. महाराज असल्यापासून दत्तपीठामध्ये दत्तप्रभूंच्या पादुका प्रतिष्ठापित होत्या. गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर परमानंदस्वामींनी त्या पादुकांची स्थापना त्यांचे परमभक्त व परमस्नेही श्रीभवानंदस्वामी यांच्या निवासस्थानी प्रस्थापित केल्या.हा एक विलक्षण दुग्धशर्करा अमृतयोग होता. भाऊंच्या दृष्टीने तर परमभाग्य उदयास आले होते . कृपये परमानंद फळे. भाऊ कृतकृत्य झाले होते व आपल्या भावपूर्ण मनोगतातून त्यांनी प्रभूंविषयी कृतज्ञता व्यक्त केली . भाऊंचे निवासस्थान आता पादुकामंदिर झाले होते. या मंदिरातच आता प्रभूंचे गुणगायन अनवरत होणार होते . भविष्य काळात मलाही त्याचा लाभ होणार होता .
कार्यक्रमाचा समारोप प्रभूंच्या निरूपणाने झाला . " आतापर्यंत कार्य घडत राहिले पण त्याचा नेमका कुणाला काय लाभ झाला याचा कधी विचार आपण केला आहे का ? जे काही घडत गेले त्याला कार्य तरी कसे म्हणावे ? कार्य तेच जे बुध्दीला प्रगल्भ करते . शुध्द व निश्चयात्मक बुध्दी मनाला आनंदाचा शोध घ्यायला प्रवृत्त करते . पण मनाच्या ठिकाणी संसारभाव असतो म्हणून आम्हाला प्रथम जीवाच्या जीवनात व नंतर मनात प्रवेश करायला लागतो. सद्यस्थितीत शब्दबंबाळ बुध्दी या प्रकियेच्या आड येत आहे आणि मनाला व्यापक आनंदाच्या अनुभवापासून दूर नेत आहे . जीवन कार्यापासून व कार्य जीवनापासून अलिप्त राहू शकत नाही . म्हणून आता कार्याची फेरमांडणी करणे आवश्यक आहे . आजचा दिवस महत्वाचा आहे . आज कार्य कात टाकत आहे . आजच्या गुरुमंत्र संस्काराने या नवीन कार्याचा श्रीगणेशा झाला आहे .येणाऱ्या काळात इथे फक्त भक्तीचा बोलबाला असणार आहे पुस्तकी ज्ञानाचा नाही. हा नियतीचा शुभसंकेत आहे. आमचे सर्वांना आशिर्वाद आहेतच "
प्रभूंच्या चेहर्यावर तेजस्विता होती. 'हा राम माझा ' च्या लिखाणातून त्यांनी बदलत्या कार्यस्वरूपाची चुणूक दाखवली होतीच . आता अधिक जोमाने प्रभू कार्यरत होणार होते . प्रभूंच्या जीवनचरित्रात हा एक निर्णायक टप्पा होता .
या एका दिवसात माझ्याही भक्तिजीवनात आमुलाग्र बदलाची चाहूल लागली होती . आता एकीएक भावाचा प्रवास सुरू झाला होता. देवाचे या प्रेम घेऊनी
.... श्रीपरमानंदार्पणमस्तु