
Guru Shishya Sukhanandsamwad as on 27th March 2026
देवप्रेम असे एक थोर भारी ।अनुभवाने ते जाणवे अंतरी ।त्या प्रेमाविण अन्य मी नेणिले -। देवहृदयीचे प्रेम मी जाणिले ॥
त्या वर्षी गुरुपौर्णिमा गुरुवारीच होती. 2001 का 2002 साल असावे. प्रभूंनी सकाळी आम्हा चौघांवर गुरुमंत्राचा संस्कार करण्याचे योजिले होते. मी विचार करत होतो. उपासना मंत्राच्या संस्काराच्या पाठोपाठ लगोलग गुरुमंत्राचा संस्कार करण्याची उर्मी प्रभूंना का बरे आली असावी ? दत्तपीठात काहीतरी वेगळ घडतयं असे जाणवत होते पण नेमके काय घडतयं ते कळत नव्हते. मात्र प्रभूच्या चेहर्यावर एक प्रकारे निश्चयात्मकता दिसत होती. प्रभूंप्रती दृढ श्रध्दा होती व जे घडेल ते चांगलेच घडेल असा विश्वास होता. नामकरण विधीचे सोपस्कार पूर्ण झाले . प्रभूंनी त्यांच्या छोट्याशा निवेदनात गुरुसंस्काराचे व शिष्यभावाचे महत्व समजावून सांगितले. " " पूर्वी शिष्य सद्गुरूंच्या शोधात असत . आता असे शिष्य दुर्मीळ आहेत म्हणून सद्गुरूच पुढाकार घेऊन संस्कार करतात. गुरूशिष्य नात्यातून गुरूशिष्य संबंध निर्माण होणे महत्वाचे. जसजसे हे संबंध घट्ट
होत जातील तसतसा शिष्यभाव दृढ होत जाईल. यास्तव सद्गुरूंना जीवनात केवळ प्राधान्यच नाही तर संपूर्ण शरण जाऊन आपले जीवन समर्पित करणे हेच स्वधर्माचरण होय. सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणम् व्रज . तुम्हाला चौघांवर आनंदस्वामी म्हणून एकत्रितपणे संस्कार झाला आहे. म्हणून प्रत्येकाचे जरी स्वतंत्र आध्यात्मिक बारसे झाले असले तरी त्या नामांमध्ये एक समान सूत्र आहे व म्हणून परस्परांचे हात हातात घेऊन व सलोख्याचे संबंध राखत सर्वांनी एकदिलाने ते संयुक्त सूत्र सार्थ करायचे आहे "
प्रभूंचे निवेदन झाल्यावर अल्पोपाहार झाला व आम्ही निघालो . एवढ्यात प्रभूंनी मला गॅलरीत बोलावून घेतले. " आज संध्याकाळी गुरुपौर्णिमेचा मोठा कार्यक्रम हाॅलमध्ये नाहीए . पण भाऊंकडे भेटून पौर्णिमा साजरी करून या. भाऊंकडून पत्ता घ्या . आपण 6.00 वाजता भेटू या . " मी हो म्हटलं आणि निघालो. पण मनात विचारचक्र सुरू झाले. नक्की काय घडतयं याचा अंदाज येत नव्हता . इतर कोणाशी चर्चा करण्याचा प्रश्न नव्हता आणि आता प्रभूंचेच सांगणे माझ्याकरता प्रमाण व अंतिम असल्यामुळे तशा चर्चेची आवश्यकताही नव्हती. अर्थात गुरुमंत्राच्या संस्काराच्या त्या शुभदिनापासून माझ्या भक्तिजीवनाच्या सुगम नांदीचे शुभसंकेत मिळायला प्रारंभ झाला होता , हे नक्की.
संध्याकाळी काय घडले ? खूप काही घडले. जे काही घडले ते तसे घडणे आवश्यकच होते . तो एक स्वतंत्र एपिसोडचा विषय आहे . देव हृदयीचे प्रेम ... श्रीपरमानंदार्पणमस्तु.