
Guru Shishya Sukhanandsamwad as on 3rd February 2026
प्रेमसेवन तुझी आवडी। मजसी लागली त्याची गोडी। प्रेमसेवन म्हणूनी माझे सारखे ते घडतसे। देवा तुझे प्रेम कसे॥ लहानपणापासून रोज म्हणता म्हणता रामरक्षा स्तोत्र पाठ झाले होते. दररोज म्हटले जात होते. दत्तप्रभूंच्या कार्यात कृष्णासंगे खेळत आत्मारामाची भेट घ्यायची आहे असे प्रभू वारंवार सांगत असत. रामरक्षेतसुध्दा शेवटी ' भो राम मामुध्दर ' अशी श्रीबुधकौशिक ऋषींनी प्रार्थना केली आहे. हे तोंडपाठ होते. पण प्रापंचिक धावपळीत या प्रार्थनेचा शाब्दिक अर्थ जरी समजला तरी तसा भाव नव्हता. बाह्यांगाने प्रभूंची भेट झाल्यावर त्यांच्या सहवासात व संवादातून हे जीवन लौकिक संसार करण्यासाठी प्राप्त झालेले नसून खऱ्या आनंदाचा अनुभव घेण्यासाठी आहे हा विचार बळावत गेला . दत्तप्रभूंचे कार्य तर त्यासाठीच तर होते . प्रपंचात येत असलेल्या अनुभवातून तर हा विचार अधिक खोलवर रुजत गेला. पण बाह्यांगातला राम बाह्यांगापुरता मर्यादित रहात होता. ' भो राम मामुध्दर ' च्या अनुभवाकरता अंतःकरणात रामाची भेट व्हायला हवी असा भाव निर्माण होत गेला. पण हे सहज शक्य नाही याची जाणीवही झाली होती. ही एक दीर्घकालीन प्रक्रिया आहे आणि त्यासाठी प्रयत्नात सातत्य असायला हवे हे लक्षात आले होते. प्रेमसेवनाची गोडी वाढत होती. देवा तुझे प्रेम कसे... श्रीपरमानंदार्पणमस्तु.